श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ज्ञानसागरातील मोती

श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ज्ञानसागरातील मोती

कै. गोपालबाबांनी प्रकाशित ग्रंथाचे अध्याय व पान क्रमांक संदर्भ आहेत. 
ह.भ.प. हरिभाऊ निटूरकरांच्या प्रतीचे नाहीत.

ज्ञान सागरातील मोती
कथनातून विविध विषयांची माहिती व उपदेश
सिद्ध योगी शंकर भटांना श्रीपादांचा महिमा उपदेशताना  अ.2 पान 7
सृष्टीमधे प्रत्येक पदार्थाला स्पंदन  होत असते. भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ति व्यक्तीमधे आकर्षण तर काहीं मधे विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल , सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी संचय होतो. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने  पुण्यशील व्यक्तिचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापाचा नाश होतो. या सर्वांचे फल स्वरूप म्हणून श्री दत्त प्रभूंवर भक्ति जडते. अरे बाबा, शंकर भट्टा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास.
*कणाद महर्षींचा कण सिद्धांत विषद करतात - पलनी स्वामी
अ.     3. पान 14.

समस्त सृष्टी परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण आपापल्या कक्षेमधे परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवता ग्रह आपापल्या भिन्न कक्षेत परिभ्रमण करीत असतात. त्याच प्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्र बिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म असा स्थितीत प्राणीमात्रांचे भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील असा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा त्याचा स्वभाव आहे. या स्पंदनांच्या पेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला (पलनी स्वामी  म्हणतात) सर्वांचे अनंत भाग केले असता. एकएक कणाचा भाग शून्य समान होतो. अनंत अशा शून्य कणांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे. पदार्थसृष्टी ज्याप्रकारे होते तिच्याप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांचे सुद्धा असते. या दोन्हींचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. ( प्रा. अद्वयानंद गळतगे यांचे विश्लेषण - व्यतिरेक कणांना फिजिक्समधे अँटीमॅटर म्हणतात. ते व सामान्य कण एकत्र आले तर दोन्ही मॅटर म्हणजेच कणपदार्थ नष्ट पावतात)
 पदार्थाच्या गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता, ती मुर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पुर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीत असतात. गायत्री मंत्र देखील या शक्तीमधे सामावलेला असतो. गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु मंत्रात चौथा पादसुद्धा आहे. तो असा  “परोरजसि सावदोम ” चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते.
नवनाथ व नव नारायण यात फरक काय?
अ.32 पान 213.

प्रभू,  नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अवतार आहेत असे आपण सांगितले मग नवनारायण आणि नवनाथ यांच्यात फरक काय?
आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पहात श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले,
‘श्रोत्यांनो, समस्त सृष्टीच्या संकल्पाचे स्वरूप मीच आहे. देवीदेवतांचे कार्य करण्याचे  संकल्प  सुद्धा  माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात. या अंशमात्र संकल्पनांना थोडे फार स्वातंत्र्य असते. हे स्वातंत्र्य शेतातील बांधलेल्या गाईस चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य तेवढेच आहे. तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाते. संकल्प मात्र मूल तत्वावासूनच येतात. त्याचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावताराचे कार्य असते. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अंशावतारात आणि पूर्णावतारात काही फरक नसतो.
श्री नवनाथांचे नाव ऐकताच  श्रीपाद प्रभुंच्या दोन्ही नेत्रातून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होउन  सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले. ते अत्यंत आनंदाने म्हणाले,  ‘श्रोत्यांनो, मच्छिंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग,चौरंगी, भृतरि, चर्पट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. या त्यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते. श्री दत्त प्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते. कलियुगाच्या आरंभापुर्वी श्री कृष्णांनी उद्धवासारख्या  महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून, आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या  नवनारायणांचे स्मरण केले.'
नरसावधानी व त्यांच्या धर्मपत्नी यांना श्रीपाद प्रभूंनी केलेला हितोपदेश
अ. 7 पान 50.
श्री. नरसंधानी हे एक सधन शेतकरी होते. शेतातील आलेले पीक वा भाजी ते कोणालाही देत नसत. एकदा श्रीपादांनी त्यांच्याकडील शेतातील राजगिऱ्याची भाजी मागितली. पुढे त्यांनी द्यायला नकार दिला. त्यांनी एक महापंडित आत्मा श्रीपादांच्या अंगात वास करत आहे. त्याच्याकडून अगम्य लीला तो बालक करून घेतो आहे, असे गावात सर्वत्र उठवले. त्यामुळे कालांतराने त्यांच्यावर दारिद्र्य आले. नंतर ते खंगत मृत्यू पावले, तेंव्हा मुलगा प्रेताला अग्नी देणार इतक्यात श्रीपादांनी थांबवून त्यांना उठवले. त्यानंतर ते श्रीपादांचे उपासक झाले.
अ. 6 पान 41 - 44.
प्रश्न - (बालक रूपी श्रीप्रभूंना) तू कोण आहेस? देवता? यक्ष की मांत्रिक?
उत्तर – मी मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतल्या अणुरेणूमधे विद्यमान असलेली अदृष्य शक्ती ती मीच आहे. पशुपक्षांसहित अखिल प्राणिमात्रांप्रमाणे मातृपितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच. सकल सृष्टीचा गुरू स्वरूप पण मीच आहे.
प्रश्न -  तू श्री दत्त प्रभूंचा अवतार आहेस का?
उत्तर – निःसंशयाने मीच दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्यामुळे तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे. वास्तवात मी निर्गुण निराकार आहे...
प्रश्न – सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुख-दुःख का संभवतात?
उत्तर – तुझ्यातील ‘तू‘ जीव आहेस. तुझ्यात असलेला ‘मी’ परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असे पर्यंत ‘तू’, ‘मी’ होऊ शकत नाहीस. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तो पर्यंत सुख-दुःख, पाप-पुण्य, अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला ‘तू’ नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेन, तेंव्हा ‘तू’ माझ्या निकट असशील. जसेजसे तू माझ्या निकट येशील तसातसा तू सुख–दुःख, पाप–पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रय़ी असता सुख संपन्न होशील.
प्रश्न – जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे, जीवात्मा व परमात्मा यांचे घनिष्ट संबंध आहेत असे काहींचे म्हणणे आहे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. यातील खरे काय?
उततर – तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकारनाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात सिद्ध असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे तू चालत असून, तू केवळ निमित्तमात्र आहेस. या तत्वाचे अनुसरण केल्यामुळे सुद्धा ती आनंदस्थितीत पावशील. मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थित असताना तू मोक्ष सिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःस व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना, तुझ्यातला अहंकार नाश पाऊन, मोक्षक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या, अद्वैत स्थितीमधे पण आनंदाची प्राप्ती होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो. म्हणून द्वैत स्थितीत असलो तरी, विशिष्ठाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असलो तरी मोक्ष स्थिती / ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच. ती स्थिती मन, वाचा, यांना अगोचर आहे. केवळ अनुभवाने ते जाणले जाते.
प्रश्न- श्रीपादा, सृष्टीधर्माप्रमाणे त्यामधे बदल घडवण्याचे सामर्थ्य असलेला तू, माझ्या दारिद्राचे हरण करू शकत नाही का?
उत्तर – अवश्य तुझे दारिद्र्य हरण करीन. परंतु तुझ्या पुढच्या जन्मी. थोडेफार दारिद्र भोगल्यानंतर. राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता. तरी तुला राजगिऱ्याचा मोह होता. आई-वडील, आजोबा या कोणाकडून ही मी याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तो किती? राजगिऱ्याची इच्छा झाल्यावर तू दिले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. पण आता ती वेऴ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादि रुपाने पावतो. पापाचे फल म्हणून दारिद्र्य, अल्पायुषी, कुरूप, कुख्याती इत्यादि पावतो. तुझ्या पुण्याचा आधिक भाग काढून तुला आयुष्य दिले, जेणेकरून तुझे पुण्य खर्च झाले. आता तुझे पाप जास्त असल्याकारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्या कारणाने दारिद्र्य असले तरी दोन वेळचे अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे.
मोक्ष म्हणजे काय? उत्तर - मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष
श्रीपादांची भक्तानां सांगितलेली बारा अभय वचने
अ 14, पान 112,113.
1)      माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
2)      मनो-वाक्-काय कर्म मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो.
3)      श्री पीठिकापुरम मधे मी प्रतिदिन माध्याह्नकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे सदैव रहस्य आहे.
4)      सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
5)      अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्की प्रसन्न होतो.
6)      मी श्रीपाद श्री वल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
7)      तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर, माझा कटाक्ष तुमच्यावर सदैव असतो.
8)      तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल.
9)      तुम्ही केली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्परूपाद्वारे तुमच्या सद्गुरू द्वारे तुम्हाला प्राप्त होतो.
10)   श्रीपाद श्रीवल्लभ केवळ नामरुपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठाना द्वारेच तुम्हाला कळू शकेल.
11)   श्रीपाद श्रीवल्ल्भ हा माझा संपूर्ण योगावतार आहे. जो महायोगी, महासिद्धपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
12)   तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.
श्रीपादांचा शंकर भट्टास महाग्रंथ महात्म्याचा उपदेश.
अ. 44. पान 249.
हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेला श्रीपाद चरितमृत लीला हा ग्रंथ अक्षर सत्यग्रंथ असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर, शक्ति युक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा, भक्तियुक्त अंतः करणाने पारायण केल्या इष्ट फल प्राप्ति होते.  
अत्रि, अनसूया अवधूत नावांची फोड
अ.7 पान 52
अत्रि – भूत, भविष्य, वर्तमान व सृष्टी, स्थिती, लय या अवस्था त्रयांच्या अतीत – पार जे ते माझ्या वडिलांचे नाव. अत्रि.
अनसूया – सृष्टीतील कुठल्ही पदार्थ जीवमात्राबद्दल, पद्र्थाबद्दल, लेशमात्र असूया – वाईट हेतु – नसल्यामुळे अनसूया नावाने प्रख्यात.

Comments

Popular posts from this blog

Great Naadi Lovers Series - Nileshbhai Trivedi

Great Naadi Lovers Series - Uday Mehta - A Blessed soul by Naadi Maharishis